बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षीय चिमुकली ठार ; वनविभागाकडून तात्काळ कारवाईची मागणी
यावल | खान्देश लाईव्ह न्यूज|यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मेंढपाळ कुटुंबातील दोन वर्षांच्या चिमुकलीला बिबट्याने अलगद उचलून नेले आणि तिचे लचके तोडून क्रूरपणे ठार केले. ही घटना रात्री सुमारे १ वाजता उघडकीस आली. रत्नाबाई असे या बालिकेचे नाव आहे.
प्रभाकर चौधरी यांच्या शेतात ठेलारी समाजातील एक मेंढपाळ कुटुंब वास्तव्यास होते. दोन वर्षीय चिमुकली त्नाबाई ही तिची आई जिजाबाई च सोबत झोपेत असताना बिबट्याने हल्ला चढवला आणि तिला केळीच्या शेतात उचलून नेले. काही वेळातच तिचा मृतदेह शिवारातील झाडाझुडपांमध्ये आढळून आला, तोपर्यंत तिचे शरीर तुकडे तुकडे झाले होते. या भीषण घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.
घटनेची माहिती मिळताच यावलचे तहसीलदार यांच्यासह रात्री वन अधिकारी विपुल पाटील, पश्चीम विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे व अन्य सहकाऱ्यांचे पथक हे घटनास्थळी दाखल झाले. डांभुर्णी येथील पोलीस पाटलांनी दिलेल्या माहितीनंतर यावल पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर व त्यांचे सहकारी देखील रात्रीच येथे दाखल झाले.पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
सध्या रब्बी हंगामातील शेतीची कामे सुरू असल्याने शेतकरी व मजूर मोठ्या प्रमाणात शिवारात जात असतात. मात्र या घटनेनंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, अनेकांनी शेतात जाणं टाळायला सुरुवात केली आहे.
या बिबट्याने याआधीही परिसरात हल्ले केल्याच्या घटना घडल्या असून, वनविभागाने यावर अद्याप ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.