राजमल लखीचंद ज्वेलर्सवरील फसवणुकीचा ठपका हटवला

जळगाव|खान्देश लाईव्ह न्यूज|
जळगावमधील नामांकित दागिने व्यापारी राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि. यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून लावण्यात आलेला फसवणुकीचा ठपका अखेर हटवण्यात आला आहे. बँकेने अधिकृत पत्राद्वारे कंपनीला ही माहिती दिली असून, यामुळे कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे.
बँकेच्या या निर्णयाची माहिती माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मनीष जैन व कुटुंबीय उपस्थित होते. “आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा दिवाळीचा दिवस आहे. सत्याचा विजय होतोच, फक्त थोडा उशीर होतो,” असे जैन यांनी सांगितले.
फसवणुकीचा ठपका हटवण्याचा निर्णय कसा झाला?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या फसवणूक ओळख समितीने १३ मे २०२० रोजी झालेल्या बैठकीत आर.एल. ग्रुप कंपनीचे खाते फसवणूक श्रेणीत वर्गीकृत केले होते. हा अहवाल नंतर रिझर्व्ह बँकेला (RBI) सादर करण्यात आला आणि खाते सेंट्रल फ्रॉड रजिस्टरमध्ये नोंदवले गेले. मात्र, कंपनीने या निर्णयाला कायदेशीर आव्हान दिले होते.
बँकेने पत्रात स्पष्ट केले आहे की, फसवणूक म्हणून श्रेणीकरण करताना कंपनीला आपली बाजू मांडण्याची संधी न दिल्यामुळे हा ठपका हटवण्यात आला आहे. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी कंपनीच्या खात्यावरील फसवणुकीची नोंद अधिकृतरित्या काढण्यात आली आहे.
राजमल लखीचंद ज्वेलर्सला मोठा दिलासा, परंतु…
बँकेने हा ठपका हटवला असला तरी, हा निर्णय अंतिम नसून, RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार भविष्यात तपास पुन्हा सुरू केला जाऊ शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि. यांना व्यवसायिक दृष्टिकोनातून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या प्रतिमेवर सकारात्मक परिणाम होणार असून, भविष्यातील व्यवहारांवरही परिणाम होणार आहे.
सीबीआय, ईडी कारवाईवर काय परिणाम?
स्टेट बँक ऑफ इंडियाने लावलेल्या ठपक्यामुळे कंपनीवर सीबीआय (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) मार्फत कारवाई झाली होती. बँकेचा ठपका हटवल्याने पुढील सर्व चौकशी व कारवाई थांबण्याची शक्यता आहे, असा विश्वास ईश्वरलाल जैन यांनी व्यक्त केला आहे.
याशिवाय, SBI ने चुकीची कारवाई केल्याबद्दल दिलगीर असावे, यासाठी आम्ही त्यांना पत्र देणार आहोत, असेही जैन यांनी सांगितले.
हा निर्णय राजमल लखीचंद ज्वेलर्ससाठी मोठा दिलासा असला तरी, भविष्यातील कायदेशीर प्रक्रियांवर त्याचा नेमका काय परिणाम होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.