कृषी उत्पादक, विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते-बियाण्याबाबत मार्गदर्शन करावे – मंत्री संजय सावकारे

जळगाव, दि. ५मे २०२५ |खान्देशलाईव्ह न्यूज|
“शेतकऱ्यांचा कृषी उत्पादक,विक्रेत्यांवर विश्वास असतो. त्यामुळे त्यांना गुणवत्तापूर्ण खते व बियाण्यांची माहिती देणे ही विक्रेत्यांची नैतिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन राज्याचे वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले.
कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेत्यांची खरीप हंगाम-२०२५ साठी जिल्हास्तरीय कार्यशाळा कृषी विभागातर्फे नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत मंत्री सावकारे बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नाशिक कृषी विभागाचे सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी पद्मनाभ मस्के, प्रगतशील शेतकरी एस. बी. पाटील, निविष्ठा विक्रेते प्रतिनिधी सुरेश मालू, राजू पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विक्रेते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री सावकारे म्हणाले, “सध्या रासायनिक खतांच्या दुष्परिणामामुळे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. त्यामुळे कंपोस्ट खत व जैविक उत्पादनांची मागणी वाढली आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना दर्जेदार पर्याय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.”
ते पुढे म्हणाले, “कंपन्या थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू लागल्याने विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी विश्वासाचे नाते टिकवून, त्यांच्या गरजेनुसार खत-बियाण्यांचा सल्ला द्यावा. शेतकऱ्याचा फायदा झाला तरच विक्रेत्यांचा टिकाव लागेल.”
कार्यक्रमात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी विभागाला सूचनाही दिल्या. ते म्हणाले, “तालुकास्तरावर पिकांवरील रोग व नुकसान टाळण्यासाठी बैठका घ्याव्यात. एकही बोगस बियाणे बाजारात येणार नाही याची पूर्ण दक्षता घ्यावी. शेतकऱ्यांच्या माती व हवामानानुसार योग्य सल्ला द्या. नैतिकतेचा विचार करूनच निविष्ठा विक्री करा.”
अंतरपीक घेण्याचे आवाहन
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी यावेळी शेतकऱ्यांना अंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहनही केले. “कापूस लागवडीसोबतच तूर, उडीद, मूग यांसारखी दाळ वर्गीय पीके अंतरपीक म्हणून घ्यावीत. यामुळे जमिनीत पोषणद्रव्यांची समतोल मात्रा टिकेल आणि सकल उत्पादनातही वाढ होईल,” असे त्यांनी सांगितले.